जमिनीचा तुकडा माणसाच्या जीवावर बेतू शकतो याचा प्रत्यय हिंगणगाव येथे आला आहे. हिंगणगावच्या कुंडले कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादाचे रूपांतर अखेर भीषण दुहेरी हत्याकांडात झाले. संभाजी मारुती कुंडले (वय 47) याने आपले वडील मारुती बंडू कुंडले (वय 72) आणि धाकटा भाऊ शीतल मारुती कुंडले (वय 45) यांची शेतातच अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या हल्ल्यात संभाजीचा मुलगा विवेक हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
नेमका वाद काय होता?
कुंडले कुटुंबाची हिंगणगाव शिवारात तीन एकर शेती आहे. यातील दोन एकर जमीन वडील मारुती आणि धाकटा भाऊ शीतल यांच्याकडे होती, तर केवळ एक एकर जमीन संभाजीच्या वाट्याला आली होती. या विषम वाटणीमुळे संभाजीच्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून संताप धुमसत होता. यापूर्वीही त्याने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून त्यांना जखमी केले होते. चार दिवसांपूर्वीच हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते, मात्र पोलिसांनी वेळीच कठोर पावले उचलली असती तर आज हे दोन जीव वाचले असते, अशी संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
पोलीस स्थानकात आरोपीने स्वत:च दिली कबुली
रविवारी दुपारी वडील मारुती आणि भाऊ शीतल हे शेतात कामात व्यस्त होते. यावेळी संभाजी तिथे पोहोचला आणि पुन्हा जमिनीवरून शाब्दिक चकमक उडाली. रागाच्या भरात संभाजीने जवळच असलेली कुऱ्हाड आणि खोरे उचलून दोघांच्याही डोक्यात वार केले. घाव इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या कृत्यानंतर आरोपी संभाजीने स्वतः हातकणंगले पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह विहिरीजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा जमिनीच्या वादापायी असा दुर्दैवी अंत झाल्याने हिंगणगावावर शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा :
