अशोक खरात याच्या अटकेनंतर रोज नवनवीन खुलासे होत असतानाच, आता त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीतील पहिल्या हत्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 2007 साली नाशिकमधील पत्रकार बाळू तुपे यांची झालेली हत्या हा खरातचाच कारनामा होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. विशेष म्हणजे, तत्कालीन पोलीस यंत्रणेने खरातला वाचवण्यासाठी कशा प्रकारे लोटांगण घातले, याचीही चर्चा आता रंगू लागली आहे.
advertisement
काय आहे 'बाळू तुपे' हत्या प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, 2007 मध्ये पत्रकार बाळू तुपे यांनी खरातच्या भोंदूगिरीवर आणि अवैध कामांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खरातने उलटा डाव टाकत बाळू तुपे यांच्यावरच आरोप केले. त्यानंतर कालांतराने तुपे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. नाशिकमध्ये त्यावेळी या प्रकरणाची मोठी चर्चा होती, काही वर्तमानपत्रांनी यावर लेखही प्रसिद्ध केले होते, मात्र राजकीय आणि प्रशासकीय दबावामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेतले गेले नाही.
आव्हाडांचा सभागृहात आक्रमक पवित्रा
जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात या विषयावर आक्रमक पवित्रा घेतला. अशोक खरात हा पोलीस आणि महाराष्ट्र प्रशासनाला माहीत आहे. त्याला वाचवण्यासाठी अनेक बड्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले आणि त्याच्यासमोर लोटांगण घातले, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला. तुपे यांच्या कुटुंबीयांनी आव्हाड यांची भेट घेऊन या जुन्या जखमेला न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे
फडणवीसांनी दिले आश्वासन
या गंभीर आरोपांची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, जर बाळू तुपे यांच्या हत्येचा संबंध अशोक खरातशी असेल तर निश्चितपणे या प्रकरणाची चौकशी केली जाईल. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही.
