2024 च्या नोव्हेंबरपर्यंतच्या तुलनेत 2025 मध्ये एप्रिलपर्यंत गर्भपातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान संभाजीनगर जिल्ह्यात 905.1 मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरी 566.1 मिमीच्या तुलनेत 160 टक्के अधिक होता. या अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरणे, स्थलांतर, औषधोपचारात खंड आणि मानसिक ताण यामुळे गर्भवती महिलांची प्रचंड धावपळ झाली. जिल्ह्यात 2014 मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत 1,959 गर्भपातांची नोंद होती.
advertisement
मात्र, 2025 मध्ये याच कालावधीत ही संख्या वाढून सुमारे 2,800 वर पोहोचली आहे. ही वाढ आरोग्य यंत्रणेसाठी गंभीर इशारा मानली जात आहे.अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरल्याने एका 26 वर्षीय गर्भवती महिलेला कुटुंबीयांसह रात्री घर सोडावे लागले. सलग दोन दिवस तिला आवश्यक औषधे घेता आली नाहीत. तिसऱ्या दिवशी पोटात वेदना सुरू झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवले, मात्र गर्भातील बाळ वाचवणे शक्य झाले नाही.
पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाल्याने गर्भवती महिलांना रुग्णालयांपर्यंत पोहोचता आले नाही. यामुळे 12 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीतील गर्भपातांची नोंद रुग्णालयांत घटली आहे. 2024 मध्ये एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान 2741 गर्भपातांची नोंद होती, ती 2025 मध्ये घटून 1,388 वर आली आहे. तज्ज्ञांच्या मते, पूरग्रस्त भागांमध्ये गर्भपातांचे प्रमाण साधारणतः 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. मात्र, संभाजीनगरमध्ये ही वाढ 42 टक्क्यांपर्यंत जाणे अत्यंत चिंताजनक आहे.
दरम्यान, ‘नेचर’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध अभ्यासानुसार, पुराच्या संपर्कात येणाऱ्या महिलांमध्ये गर्भपाताचा धोका सरासरी 8 टक्क्यांनी वाढतो. संभाजीनगरमधील आकडेवारी आरोग्य सेवा आणि आपत्ती व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.
