शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' गडचिरोलीत आहे. याच यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भाग्यश्री आत्राम यांनी 'तुतारी' फुंकली.
माझ्या लेकीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर मी तिला आणि तिच्या सासरच्या मंडळींना नदीत फेकून देईन, अशी आक्रमक भूमिका मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतली होती. मात्र भाग्यश्री यांनी वडिलांच्या भूमिकेविरोधात जाऊन तुतारी फुंकली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत बापलेक आमनेसामने असणार आहेत.
advertisement
कोण आहे भाग्यश्री आत्राम?
भाग्यश्री आत्राम या धर्मरावबाबा आत्राम यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. पुण्यातील भारती विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. २०१३ मध्ये त्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. बेळगावच्या ऋतुराज हलगेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर २०१९ पासून काही कारणांनी बापलेकीत राजकीय शत्रुत्व निर्माण झाले. विधानसभेच्या तोंडावर त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. हे पक्षांतर होऊ नये म्हणून धर्मरावबाबा आत्राम तसेच अजित पवार यांनीही प्रयत्न केला परंतु भाग्यश्री यांनी बापाविरोधात बंड करून विधानसभा लढण्याचा निर्णय घेतला.
कोण आहेत धर्मरावबाबा आत्राम?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम हे विदर्भातील प्रमुख चेहरा होते. अनिल देशमुख यांच्यानंतर आत्राम यांच्याकडे विदर्भाचा चेहरा म्हणून पाहिले जायचे. मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर आत्राम यांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. दादांनीही आत्राम यांना ज्येष्ठ नेत्यांबरोबर झटक्यात मंत्री केले. अहेरी विधानसभा मतदारसंघातून आत्राम तीन टर्म आमदार आहेत. विधानसभा निवडणूक १९९९, २००४ आणि २०१९ मध्ये त्यांनी अहेरीचे प्रतिनिधित्व केले. सध्या ते महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत.
