कांचनवाडी पुलावर गुरुवार, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयशर ट्रकच्या निष्काळजी वळणामुळे झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये गजानन सांडूसिंग गुमलाडू (40, वरझडी, ता. गंगापूर) आणि पत्नी राधा गजानन गुमलाडू वय 35 यांचा समावेश आहे. त्यांचा मुलगा विशाल याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
advertisement
गजानन गुमलाडू हे खडी क्रशरवरील क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत होते. सासऱ्यांची तब्येत काही दिवसांपासून बिघडलेली असल्याने गजानन गुरुवारी सकाळी पत्नी आणि मुलाला घेऊन जालना जिल्ह्याकडे निघाले होते. कांचनवाडी पुलावर आल्यावर पुढे असणाऱ्या आयशर ट्रकने (MH 48 BM 2455) अचानक उजव्या लेनमधून यूटर्न घेण्याचा प्रयत्न केला. या अनियमित वळणामुळे गुमलाडू यांच्या दुचाकीची (MH 20 GS 1309) जोरदार धडक बसली. भीषण धडकेत दाम्पत्याला डोक्यावर आणि छातीवर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा विशाल याच्या छातीला आणि तोंडाला जबर मार लागला आहे.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्परता दाखवत ट्रकचालक अनिल संजय राठोड (30) यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सातारा ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी याची माहिती दिली. या अपघातात सहभागी असलेल्या आयशर ट्रकवर नोव्हेंबर 2019 ते नोव्हेंबर 2025 या सहा वर्षांच्या कालावधीत तब्बल 45 वेळा वाहतूक नियमभंगाची नोंद आहे. यापैकी 37 चलानांचा 24,350 रुपयांचा दंड अद्याप भरलेलाच नाही, अशी माहिती समोर आली आहे. सिग्नल तोडणे, वाहन न थांबवणे आणि प्रवेशबंदी क्षेत्रात घुसणे अशा गंभीर नियमभंगांचा यात समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित कारवाई असलेले वाहन अजूनही रस्त्यावर कसे काय? असा प्रश्न नागरिकांकडून वाहतूक पोलिसांना विचारला जात आहे.
उड्डाणपुलावर चढल्यानंतर मोठा फेरा पडेल, हे टाळण्यासाठी ट्रकचालकाने उजव्या लेनमधून थेट यूटर्न घेण्याचा प्रयत्न केला. ट्रक रस्त्याच्या मध्यभागी तिरका होताच मागून आलेली दुचाकी त्यावर आदळली आणि हा दुर्दैवी अपघात घडला. गुमलाडू यांच्या पश्चात त्यांच्या आई- वडिलांसह दोन भाऊ आणि दोन मुलांचा परिवार मागे राहिला आहे. एका निष्काळजी वळणाने दोन जीव गेले आणि एक चिमुकला आई-वडिलांशिवाय अनाथ झाला—या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
