महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये केवळ पिकांचेच नुकसान झाले नाही तर जनावरेदेखील मोठ्या प्रमाणावर दगावली आहेत. शेती खरवडून गेली आहे. फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. घरादारांत पाणी शिरले आहे. अशा स्थितीत पीडित शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यासंदर्भात मदत आणि पुनर्वसन विभागाची मोठी भूमिका असते. मात्र विभागाच्या सचिवांचीच बदली करण्याचा आदेश शासनाने काढल्याने चर्चा होत आहे.
advertisement
सोनिया सेठी यांची नियुक्ती बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाचे महाव्यवस्थापक
सोनिया सेठी यांना महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात विभागाच्या सचिव म्हणून त्यांची खरी गरज असताना त्यांचीच बदली केल्याने काँग्रेसने शंका उपस्थित केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची एक्सवरील पोस्ट
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिव सोनिया सेठी यांची बदली करण्यात आली आहे. राज्यात पूरग्रस्त भागातील परिस्थितीची दाहकता फार आहे. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या कार्याची गरज असताना ही बदली कितपत योग्य आहे? का ती शिक्षा आहे? जनता अत्यंत कठीण अवस्थेत असताना विभागात नेतृत्व बदल केल्याने अफरातफरीचे वातावरण निर्माण होणार नाही का? नवीन अधिकाऱ्याला विभागाचे काम समजून घेण्यासाठी वेळ लागणार नाही का? प्रशासन योग्य पध्दतीने चालले नाही याचे हे उदाहरण आहे, असे पोस्ट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक्सवर केली आहे.