लग्नसराईचा हंगाम आणि फुलांना असलेली आंतरराष्ट्रीय मागणी अशा महत्त्वाच्या वेळी 'इंडिगो एअरलाईन्स'मधील तांत्रिक अडचणींमुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. याचा थेट आणि मोठा फटका मावळ भागातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यवसायाला बसला आहे. विमानसेवा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातील लाखो रुपयांचे उत्पादन वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
दररोजचा दहा लाख रुपयांचा व्यवसाय ठप्प
advertisement
मावळ तालुक्यातून दररोज सुमारे ५० हजार गुलाब फुलांची विमानाने निर्यात केली जाते. सामान्यतः एका गुलाबाचा भाव सरासरी २० रुपये असतो, पण या फुलांची किंमत दररोज दहा लाख रुपये होते. गुलाबांची निर्यात हा मावळमधील शेतकऱ्यांसाठी मोठा व्यवसाय आहे. मात्र, इंडिगोच्या विमानसेवेतील गोंधळामुळे देशांतर्गत आणि परदेशात निर्यात होणाऱ्या गुलाब फुलांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत.
सेवा बंद पडल्याने ऑर्डर्स रद्द झाल्या
शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, अचानक वाहतूक ठप्प झाल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पांडुरंग शिंदे या शेतकऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडे आठ टन गुलाब शेती आहे आणि रोज सुमारे आठ हजार फुले मिळतात. इंडिगोमार्फत ते दोन हजार फुले परदेशात पाठवत होते, पण सेवा बंद पडल्याने परदेश विमानतळावर असलेले त्यांचे अनेक ऑर्डर्स रद्द झाले आहेत.
मंगेश खन्ना या शेतकऱ्याने सांगितले की, ते दररोज एक ते दीड लाख फुलांची दिल्ली, वाराणसी, लखनऊ, गुवाहाटीमध्ये निर्यात करतात. उड्डाणे रद्द झाल्यामुळे आता उर्वरित मालाला किती किंमत मिळेल याची शाश्वती राहिली नाही आणि बऱ्याच फुलांचे नुकसान झाले आहे.
या नुकसानीची भरपाई कोण करणार?
लग्नसराईच्या मोसमात, जेव्हा फुलांच्या मागणीत वाढ होते, तेव्हा अशा प्रकारे विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मेहनतीने पिकवलेले उत्पादन हातातोंडाशी आले असताना, ते वाया जाण्याची वेळ आली आहे. या प्रचंड आर्थिक नुकसानीची भरपाई कोण करणार, असा थेट प्रश्न आता हवालदिल शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर उभा केला आहे.
