जळगाव : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा जवळ आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्त्वाच्या जागांवर मतदान पार पडेल. यापैकी महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेरचा. राज्यातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे रावेर. रावेर आणि भाजप हे समीकरणच बनलं आहे. आघाडी काळात सत्तेपासून भाजप दुर होतं. तरी इथून कमळावरील उमेदवाराने लोकसभा वारी केलीये. अशा भाजपचा बालेकिल्लात भाजपचे दोन समर्थ शिलेदार आहेत. पैकी एक आहेत एकनाथ खडसे आणि दुसरे गिरीश महाजन. महाजनविरुद्ध खडसे वादाने टोक गाठलं होतं. खडसे राष्ट्रवादीत असताना महाजनांवर तुटून पडत होते. मात्र, सुनेला भाजपने उमेदवारी दिल्यामुळे त्यांची घरवापसी झाली. 12 मेला रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे. अशात शरद पवारांनी इथं मोठी खेळी केलीये. पवारांनी ही जागा आपल्याकडे घेतली. तर भाजपने रक्षा खडसेंना हॅट्रिक करण्याची संधी दिलीये. असं असलं तरी देखील काही भाजपातील असलेल्या गटबाजीचं मोठं आव्हान इथं आहे. दुसरीकडे शरद पवारांची रणनिती वंचितचा उमेदवार या जागेवर प्रभाव पाडत आहेत. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेला महत्त्व आले आहे.
advertisement
फडणवीसांची भूमिका महत्त्वाची
रावेरमधील भाजपांतर्गत गटबाजी उफाळून वर आलीये. मंत्री गिरिष महाजन यांनी खडसेंवर जोरदार निशाणा साधला होता. खडसे राष्ट्रवादीतून भाजपात आले. यानंतर दोघा नेत्यांमध्ये सुलाह होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, महाजनांनी खडसेंना विझलेला दिवा म्हटलं. नव्या वादाला सुरुवात झाली. अशात फडणवीसांनी हस्तक्षेप केल्याचं बोललं जातंय. दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवणे, भाजपच्या उमेदवारासाठी फिल्डिंग लावण्याचं काम फडणवीस करत आहेत. खडसेंना मुळ राग हा फडणवीसांवर आहे. त्यामुळे फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या महाजनांकडून त्यांना वेळोवेळी प्रतिउत्तर देण्यात आलं. भाजपने विधानसभेचं तिकीट कापलं, नंतर विधानपरिषद ही नाकारली. त्यामुळं खडसे राष्ट्रवादीत गेले. मात्र, जळगाव राष्ट्रवादीत खडसेंचा सन्मान झाला नाही. जिल्ह्याच्या निर्णयप्रक्रियेपासून त्यांना दुर ठेवण्यात आलं होतं. अशात खडसेंनी भाजपात परतण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला फडणवीसांकडून विरोध झाला नाही. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी हे विधान केलं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये सामंज्यस प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे खडसे महाजनांना पुर्ण ताकद फडणवीस पुरवत आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघाची रचना कशी आहे?
रावेर लोकसभा मतदारसंघ हा दोन जिल्ह्यांनी मिळून बनलेला मतदारसंघ आहे. इतर मतदारसंघाप्रमाणे इथंही 6 विधानसभा आहेत. पैकी जळगाव जिल्ह्यातील पाच आणि बुलढाण्यातल्या एका विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघात लता सोनवणे या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आहेत. भुसावळचे संजय सावकारे आणि जामनेरचे गिरीष महाजन हे भाजपचे आमदार आहेत. तर रावेरमध्ये शिरीष चौधरी आणि मलकापूरमध्ये राजेश एकडे हे काँग्रेसचे आमदार आहेत. तर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत उर्फ भाऊ पाटील हे अपक्ष निवडून आलेत. त्यांचा पाठिंबा शिंदे गटाला आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे. शिवाय इथून गेली तिनही टर्म भाजपचाच उमेदवार लोकसभेत निवडून येतोय.
वाचा - नाथाभाऊंची घरवापसी रखडली; भाजपमध्ये कुणाचा विरोध? खडसेंचा रोख कुणाकडे
रक्षा खडसेंना तिकीट
रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून. खडसे राष्ट्रवादीत केल्यानंतर भाजप विरुद्ध खडसे वाद पेटला होता. फडणवीसांवर टीकेच्या तोफा डागण्यात कसलीच कमतरता खडसेंनी राखली नव्हती. अशात रक्षा खडसेंच्या उमेदवारीत फडणवीसांना हस्तक्षेप करता आला असता. रक्षा खडसेंच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध होता. हा सर्व विरोध डावलत फडणवीसांनी रक्षा खडसेंच्या उमेदवारीत हस्तक्षेप केला नाही. रावेरमधून रक्षा खडसे यांचा पत्ता कट होईल अशी चर्चा सुरु होती. दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली, कारण म्हणजे राष्ट्रवादीत रावेरचे महत्त्वाचे असणारे नेते एकनाथ खडसे. पण अचानक खडसेंनी तब्येतीचं कारण सांगत निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं. इतकचं नव्हे तर त्यांनी भाजपमध्ये घरवापसी झाली. खडसेंचा विरोध व्यक्तिगत पातळ्यांवर घेणं फडणवीसांनी टाळलं. खडसे भाजपात आणि फडणवीसांनी पवारांची कोंडी केली. अशात शरद पवारांनी याठिकाणी होणाऱ्या मराठा आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेतला. नवख्या अश्या श्रीराम पाटील यांनी उमेदवारी दिली आहे. पवारांचं मराठा कार्ड इथं चालेल का? हा प्रश्न आता विचारला जातोय.
वाचा - '..तर मराठे त्यांना कचका दाखवतील' जरांगे पाटलांचा पुन्हा राज्य सरकारला इशारा
श्रीराम पाटील आणि रक्षा खडसे
शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील हे सध्या चर्चे आहेत. ते सामान्य कुटुंबातून आले. पुढं त्यांनी प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळख कमावली. शिवाय ते मराठा आहेत. शिवाय प्रचारात ‘श्रीराम’ नावाचा उल्लेख करीत आता हाच राम तुमचा विकास करेल, अशी साद मतदारांना घालत आहेत. उद्योजक असल्याकारणाने प्रचारासाठी लागणारं आर्थिक बळ देखील त्यांच्याकडे आहे. तर 2014 आणि 2019 या दोन्ही टर्मला रक्षा खडसे या भाजपच्या रावेरच्या खासदार राहिल्या आहेत. त्यामुळे प्रचाराचा, मतदारांचा कल याचा अनुभव त्यांना या निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो.