जालाना: सध्याच्या काळात तापमानात मोठी वाढ होत आहे. त्यातच मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे फळ बाजारात तेजी आहे. जालना शहरातील फळ बाजारामध्ये टरबूज आणि खरबुजाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून फळांची आवक होत असून दोन्ही फळांना चांगला दर देखील मिळत आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ बाजारातून टरबूज आणि खरबुजाच्या दर स्थितीबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ आणि भाजीपाला बाजारात सर्वच फळांची आवक वाढली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने टरबूज आणि खरबूज या फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. सध्या दररोज 40 ते 50 टन टरबुजाची आवक होत आहे. तर 25 ते 30 टन खरबुजाची देखील आवक होत आहे. टरबुजाला 9 रुपयांपासून ते 13 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. तर खरबूजला 15 रुपयांपासून 25 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.
दीड वर्षांचं बाळ अन् गंभीर आजार, काळजावर दगड ठेवून घेतला निर्णय, दहावी पास महिलेची मोठी भरारी
मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे महिनाभर या दोन्ही फळांचे दर स्थिर राहतील. त्यानंतर मात्र आवक वाढल्यानंतर दरामध्ये घसरण होऊ शकते, अशी शक्यता फळ व भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जफर खान यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, जालना बाजारात येत असलेल्या सर्व भाजीपाला व फळे ही जालना व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेली आहेत. तसेच त्यांची विक्री देखील आसपासच्या परिसरातच होत आहे. आगामी काळामध्ये आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टरबूज आणि खरबूज या दोन्ही फळांच्या मागणीत वाढ होऊ शकते. मात्र या दोन्ही फळांचा पुरवठा सुरळीत राहिला तर दर टिकून राहतील, असं व्यापऱ्यांनी म्हटलंय.





