महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपसोबत एकत्र आलो, असे उठता बसता सांगताना धर्मनिरपेक्ष विचारांशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही, असा ठाम निर्धार अजित पवार व्यक्त करताना दिसतात. दुसरीकडे भाजप नितेश राणे आणि किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाला जाणून बुजून लक्ष्य करीत असल्याची तक्रार काही नेत्यांनी अजित पवार यांच्याकडे केली. त्यानंतर अजित पवार यांनी सोमय्या यांना खडसावून कायदा हातात घेऊ नका, अशी स्पष्ट सूचना केली.
advertisement
महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही- किरीट सोमय्या
महाराष्ट्रातील मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम हाती घेतली आहे. आज बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून मशिदींवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवा, अशी सूचना केली. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांच्या भूमिकेवर सोमय्या यांना विचारले असता ते चांगलेच भडकले. "ध्वनी प्रदूषण कायदा सर्वप्रथम राजीव गांधी यांच्या सरकारने संमत केला. त्यात वाजपेयी सरकारने २००२ साली नियम प्रसिद्ध केले. ध्वनी प्रदूषणाचा कायदा गणपती महोत्सव, नवरात्रीला लागू होत असेल तर तो मशिदीला देखील लागू झालाच पाहिजे", असे सांगत महाराष्ट्रातील काही नेते दादागिरी करीत असतील तर ती चालू देणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला. मुंबईतील मशिदीवरील भोंगे खाली उतरवले आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातले भोंगे उतरवावे लागणारच, असे म्हणत आपल्या भूमिकेत ठाम असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
सोमय्या यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अजितदादांचा संताप
अजानसाठी वापरण्यात येणाऱ्या बेकायदा भोंग्यासंदर्भात मुंबईतील मशिदींची तपासणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कायदा हातात घेता कामा नये, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. महाराष्ट्र प्रशासन याकामी लक्ष घालण्यासाठी आहे. पण लक्ष घालू नये, अशा आशयाचे विधान अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांना उद्देशून केले होते.