मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला त्यांच्या सातबारा पत्रकावर वारस म्हणून नाव लावायचे होते. यासाठी त्यांनी शिंगणापूर ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. नियमानुसार हे काम होणे अपेक्षित असताना उपसरपंच दीपक कांबळे आणि ग्रामसेवक इरफान सनदी यांनी या कामासाठी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. विशेष म्हणजे, तक्रारदार गेल्या वर्षभरापासून या कामासाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवत होते, मात्र पैशांशिवाय काम करण्यास या दोघांनीही स्पष्ट नकार दिला होता.
advertisement
पाच हजारांचा पहिला हप्ता घेताना रचला सापळा
सततच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने अखेर कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार, गुरुवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपसरपंच दीपक कांबळे आणि ग्रामसेवक इरफान सनदी या दोघांनाही पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
भ्रष्टाचाराचा विळखा चव्हाट्यावर
एका बाजूला पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधीच अशा प्रकारे सर्वसामान्यांची अडवणूक करत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वर्षभरापासून रखडलेले काम केवळ लाचेसाठी अडवून ठेवणे, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणाही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीने लाचेची मागणी केल्यास त्वरित संपर्क साधावा.
