प्रवाशांच्या वेशात आले होते दरोडेखोर
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांच्या सोन्या-चांदीचे दागिने अंगडिया सर्व्हिसेसद्वारे मुंबईला नेले जातात. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईसाठी 'अशोका ट्रॅव्हल्स'ची बस रवाना झाली. या बसमध्ये दरोडेखोरांचे तीन साथीदार आधीच प्रवासी म्हणून बसले होते. गाडी कोल्हापूर सोडून किणी टोलनाक्याच्या परिसरात पोहोचताच, बसमध्ये बसलेल्या या तिघांपैकी एकाने बस चालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला गाडी थांबवण्यास भाग पाडले.
advertisement
अवघ्या काही मिनिटांत सव्वा कोटींचा ऐवज लंपास
चालकाने बस थांबवताच, दरोडेखोरांच्या पाठीमागून येणारी एक कार तिथे येऊन थांबली. कारमधून उतरलेल्या इतर साथीदारांनी बसच्या डिकीचा ताबा घेतला. डिकीमध्ये असलेली ६० किलो चांदी, एक तोळा सोनं आणि रोख रक्कम असा एकूण सव्वा कोटींचा माल दरोडेखोरांनी अवघ्या काही मिनिटांत कारमध्ये भरला आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाले. हा सगळा प्रकार ५ ते ७ मिनिटांत घडला.
रेकी झाल्याचा पोलिसांना संशय
या घटनेनंतर चालकाने तत्काळ ट्रॅव्हल्स मालकाला आणि पेठवडगाव पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरोडेखोर आधीच प्रवासी म्हणून बसमध्ये बसले होते आणि त्यांना डिकीतील मौल्यवान ऐवजाची माहिती होती, यावरून या गुन्ह्यासाठी आधी मोठी रेकी करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित कार आणि आरोपींचा शोध घेतला जात आहे. महामार्गावर अशा प्रकारे सशस्त्र दरोडा पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
