'मुलगी झाली, आमचं घर पूर्ण झालं'
परवीन तिच्या संसारात आनंदी होती. तिला आधीपासूनच दोन मुले होती आणि आता तिच्या पोटी तिसरा जीव वाढत होता. नऊ महिन्यांची प्रतीक्षा ती मोठ्या उत्साहात करत होती. घरात तिच्या तिसऱ्या बाळाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. आनंदाचे वातावरण होते. 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सीपीआर रुग्णालयात परवीनने एका गोंडस मुलीला जन्म दिला. "मुलगी झाली! आमचं घर आता पूर्ण झालं," असे म्हणत तिने नव्या बाळाला मायेने कवेत घेतले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.
advertisement
एकीकडे बाळाचा जन्म, तर दुसरीकडे अंत्यसंस्काराची तयारी
बाळाच्या जन्मानंतर परवीनची प्रकृती अचानक खालावत गेली. बाळंतपणात जास्त रक्तस्राव झाल्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि तिला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. बाळाच्या आगमनाने गोड झालेल्या घरात अचानक चिंतेचं वातावरण पसरलं. डॉक्टरांनी परवीनला वाचवण्यासाठी रात्रभर शर्थीचे प्रयत्न केले, पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. बाळ अजून आईच्या कुशीत नीट विसावलेही नव्हते, तेवढ्यात 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी परवीनच्या मृत्यूची दु:खद बातमी दिली. हे ऐकून सर्वांचे मन सुन्न झाले. एका बाजूला बाळाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या वस्तूंची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे परवीनच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जात होती.
आईचा स्पर्शही मिळाला नाही
सर्वांत दु:खद गोष्ट म्हणजे, परवीनने जगाचा निरोप घेतला, तेव्हा हे बाळ फक्त १९ तासांचे होते. तिच्या जीवनाची पहिली आठवणच 'आईचा मृत्यू' अशी बनली. तिला अजून आईचा स्पर्श, तिची माया, दूध आणि ऊब यापैकी काहीच मिळाले नाही. फक्त एकदाच ती आईच्या कुशीत झोपली होती. आई गेली, पण तिचा सुगंध तिथेच दरवळत राहिला.
हे ही वाचा : Weather Alert: 48 तास पावसाचे, पुणे ते कोल्हापूर यलो अलर्ट, पश्चिम महाराष्ट्राचा हवामान अंदाज
हे ही वाचा : कोल्हापूरकरांसाठी दिलासा! सततच्या पूरग्रस्त प्रश्नावर अखेर तोडगा; 524 कोटींचा पूरनियंत्रण प्रकल्प होणार सुरू
