काय म्हणाले इंद्रजित सावंत? "लंडनच्या व्हिक्टोरीया आणि अल्बर्ट म्युझियमसोबत माझा पत्रव्यवहार झाला. त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. लंडनवरून राज्य सरकार जी वाघनखं भारतात आणणार आहेत. ती शिवरायांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही, असं लंडनच्या व्हिक्टोरीया आणि अल्बर्ट म्युझियमने म्हटलं आहे. त्याचबरोबर ही वाघनखं समकालीन असू शकतात. मात्र, आजच्या घडीला खरी वाघनखं ही साताऱ्याच्या राजघराण्याकडे आहेत. त्यामध्ये शिवरायांच्या अफजलखान वधाच्या वेळी वापरलेली वाघनखं असू शकतात." सातारा राजघराणे आणि उदयनराजेंनी याबाबत पुढे येत बोलावं, अशी मागणीही यावेळी इंद्रजित सावंत यांनी केली आहे.
advertisement
संभाजी ब्रिगेड सरकारविरोधात आक्रमक: इंद्रजित सावंत यांच्या दाव्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झालं आहे. "अवघ्या महाराष्ट्राची दिशाभूल केल्याप्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांनी माफी मागावी" अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी केली आहे. "सरकार राज्यातील जनतेची दिशाभूल करत आहे. दिशाभूल करताना कोट्यवधी रूपये उधळले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आला पाहिजे. त्यासाठी समकालिन पुराव्यांचा आधार घ्यावा. गरज पडल्यास इतिहासाचे पुनर्लेखन करावे." अशी मागणी आता संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येत आहे.
विरोधकांचं शरसंधान: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "सरकार फक्त आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करत आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. याबाबत मुनगंटीवार आणि सरकारने जनतेची माफी मागावी."
सत्ताधारी पक्षाकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया येताना दिसत नाही. दुसरीकडे इंद्रजित सावंत यांनी केलेल्या दाव्यामुळे शिवप्रेमींमध्ये मात्र काहीसा असंतोष पाहायला मिळतं आहे. आता सातारा राजघराणे याबाबत काही अधिकृत प्रतिक्रिया देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यानंतर याबाबतचे सत्य समोर येईल.
