कांद्याची उच्चांकी आवक: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 1 लाख 64 हजार 457 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. आज नाशिक मार्केटमध्ये 84 हजार 507 क्विंटल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास कांद्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 324 ते जास्तीत जास्त 1354 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 270 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1200 ते 3200 रुपये सर्वाधिक भाव मिळाला.
advertisement
मक्याची आवक: राज्याच्या मार्केटमध्ये मक्याची एकूण 10 हजार 278 क्विंटल आवक राहिली. आज जळगाव मार्केटमध्ये 3500 क्विंटल मक्याची सर्वाधिक आवक होवून त्यास प्रतीनुसार 1100 ते 1451 रुपये बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 62 क्विंटल लाल मक्यास सर्वाधिक 2200 रुपये बाजार भाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 163 क्विंटल मक्यास 1600 सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.
सोयाबीन उत्पादकांची फरपट: राज्याच्या मार्केटमध्ये सोयाबीनची 49 हजार 214 क्विंटल एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केट मध्ये सर्वाधिक 20 हजार 385 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3425 ते 4276 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. लातूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 147 क्विंटल सोयाबीनला 4000 ते 4400 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला. धाराशिव मार्केटमध्ये सर्वात कमी 8 क्विंटल सोयाबीनची आवक होवून त्यास 4050 रुपये सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.
सोयाबीन खरेदी केंद्र सुरू नाहीत: अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सोयाबीनसाठी 5328 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला; तरी शासकीय खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून अवघ्या 4400 रुपयांमध्ये सर्वाउत्तम दर्जाचे सोयाबीन लुटले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची फरपट आणि पदरात तोटा कायम आहे.