खाते वाटपावरून तिढा...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र, महायुती सरकारचा जवळपास 13 दिवसांनी शपथविधी झाला. या शपथविधी सोहळ्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार या तिघांनीच शपथ घेतली. अद्यापही खाते वाटप झाले नाही. तर, दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराकडे महायुतीच्या आमदारांचे लक्ष लागले आहे. खाते वाटपावरून महायुतीमध्ये तिढा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. या मागणीला भाजपने विरोध केला आहे. त्याऐवजी अन्य खाते देण्याची तयारी भाजपने दर्शवली असल्याचे म्हटले जात आहे. तर, अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेने इतक्याच मंत्रिपदाची मागणी केली आहे.
advertisement
भाजपकडून अजितदादांना झुकतं माप?
'टाईम्स ऑफ इंडिया'ने राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, महायुती सरकारमध्ये भाजपला 20 खाती मिळतील. तर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी 10 खाती मिळतील. महायुतीमध्ये आमदारांची वाढलेली संख्या पाहता मंत्रिमंडळात अडीचृ-अडीच वर्षांचे रोटेशन पद्धत राहण्याची शक्यता आहे. तर, अन्य सूत्रांनुसार, शिवसेनेला 12 मंत्रिपदे मिळू शकतात. तर, अजित पवार गटाला काही महत्त्वाच्या खात्यांसह त्यांचे पक्षाचे आमदार असलेल्या एखाद्या लहान राज्याचे राज्यपालपद मिळू शकते.
