विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र, सरकार स्थापन होण्यास जवळपास 13 दिवसांचा कालावधी लागला. सत्ता वाटपाच्या मुद्यावरून शपथविधीला उशीर झाला असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचाच शपथविधी झाला आहे.
गृह खात्याच्या मागणीवर फडणवीसांचे स्पष्ट संकेत...
सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आमदारांना मंत्रिमंडळाचे वेध लागले आहेत. तर, दुसरीकडे खाते वाटपाच्या तिढ्यावर तोडगा निघाला नसल्याचेही म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद नसल्याने गृह खात्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना गृह खात्यावर सूचक वक्तव्य केले होते. केंद्रात अमित शाह हे गृहमंत्री आहेत. त्यामुळे आमच्याकडे गृह खाते आल्यास संपर्क साधण्यास, तातडीने कार्यवाही करण्यास सोपं होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते. त्यामुळे भाजप गृह खाते सोडणार नाही, याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
advertisement
तर, एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली होती. त्याऐवजी त्यांना महसूल खाते दिले जाण्याची शक्यता आहे. महसूल खात्याबाबतच्या ऑफरवर एकनाथ शिंदे यांनी कोणतेही भाष्य केले नाही.
दिल्लीत खाते वाटप, मंत्रिपदांचा तिढा सुटणार!
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील संभाव्य मंत्र्यांच्या यादी भाजप श्रेष्ठींकडे पोहचली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 10 जणांची नावे सादर करण्यात आली असून तर राष्ट्रवादीकडून 6 जणांची नावे पाठवण्यात आली आहे. येत्या 13 किंवा 14 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
