राज्यात स्वबळावर कधीकाळी सत्ता स्थापन करणारा आणि काही महिन्यापूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाला तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये आपला एकही आमदार विजयी करता आला नाही. राज्याच्या राजकारणात काँग्रेसची ही नीच्चांकी आमदारांची संख्या आहे.
दिग्गज नेत्यांचा पराभव....
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आले. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्र्यासह सत्ता आल्यास मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असणाऱ्या नेत्यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, नसिम खान, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांचा पराभव झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अवघ्या 215 मतांनी विजय झाला.
advertisement
सहा महिन्यांर्पू्वी लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक 13 खासदार काँग्रेसचे निवडून आले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या होत्या. ऐशींच्या दशकात काँग्रेसचे राज्य विधानसभेत 200 पेक्षा अधिक आमदार निवडून येत असतं. त्यानंतरच्या काळात काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले तरी सत्तेत असणारा पक्ष होता. 2014 मध्ये भाजपने केंद्रात सत्ता हस्तगत केल्यावर काँग्रेसची घसरण सुरू झाली.
कोणत्या जिल्ह्यात काँग्रेसला अपयश?
राज्यातील 21 जिल्हे काँग्रेसमुक्त झाले आहेत. यामध्ये धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, बीड, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.
