काल (27 सप्टेंबर) पुण्यामध्ये अद्वैत थिएटर निर्मित "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" हया नाटकाचा प्रयोग होता. या नाटकाचा प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व नाट्यमंदिरामध्ये पार पडला. नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाट्यरसिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. या नाटकाच्या तिकिटामार्फत जितके काही पैसे उपलब्ध झाले आहेत, ते सर्व पैसे नाटकाच्या टीमकडून अवकाळी पाऊस परिस्थितीमुळे अडचणीत अडकलेल्या शेतकर्यांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. निर्माते राहुल भंडारे आणि नाटकाच्या टीमकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून 1,00,000/- रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लवकरच ही मदत महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील कलाकार हे शेतकरी आहेत.
advertisement
निसर्गाच्या लहरीपणाने अस्मानी संकटाला शेतकरी झुंज देताना दिसत आहे. अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊसामुळे शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडला आहे. अद्यापतरी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलेली नाही. केव्हापर्यंत सरकार शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रीमंडळ अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा पाहणी दौरा करण्यात आला. याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यात आला. यावेळी सरकारकडून शेतकर्यांना मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आधी २८ सप्टेंबरला घेण्यात येणार होती, पण ती आता 9 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. अनेक शेतकर्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. काहींच्या घरातील अनेक गोष्टी वाहून गेल्या आहेत, अगदी धन धान्यांपासून, कपडे इतरत्र वस्तूही पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेले आहेत. यासोबतच शेतातील माती, जनावरं या अनेक गोष्टींचेही नुकसान झाले आहे. सरकार शेतकर्यांना किती आणि कशा पद्धतीने मदत करणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.