कर्जमाफी देणार नसाल तर यांना गावं बंदी मोहिम हाती घेणार असल्याचा गंभीर इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफी करण्याची मागणी केली असली तरी परिस्थिती बघून निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळं शेतकर्यांनी इथून पुढे स्वहित पाहावं, असं म्हणत जर हे संपूर्ण कर्जमुक्ती करणार नसेल तर आंदोलन हाती घेऊन यांना गाव बंदी करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
advertisement
शेतकऱ्यांनी एकजूट होऊन ताकदीनं आवाज उठवावा. कर्जमुक्तीसाठी पुढच्या काळात आंदोलन हाती घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री आशिष शेलार आणि मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ईसीबीसीतून लिंक सुरु करून देण्याच्या शासन निर्णय काढण्यात आला आहे. यासाठी प्रयत्न केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आशिष शेलार यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले. आता आरक्षण दिल्यानंतर मराठा समाज तुमचं कौतुक करायला मुंबईत येईल असेही त्यांनी म्हटले.
कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात, किसान सभेचे टीकास्त्र...
शेतकऱ्यांची मतं काढून घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आज मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफी करता येणार नाही अशी विधाने केली जात आहेत. सरकारने केलेला शेतकऱ्यांचा हा पुन्हा एकदा नवा विश्वासघात आहे. सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी या पार्श्वभूमीवर किसान सभा करत असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे राज्य महासचिव डॉ. अजित नवले यांनी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याएवढे मोठे अंथरूण राज्य सरकारचे नव्हते याची जाणीव निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासन देऊन मते पदरात पाडून घेतेवेळी नव्हती का ? असा सवालही त्यांनी केला.
