राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मलगुंडे हे संपूर्ण महाराष्ट्रात नगराध्यक्षपदासाठीचे पहिले उमेदवार ठरले आहेत. काल, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उरुण ईश्वरपूर कार्यालयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
advertisement
संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आनंद मलगुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
मागील काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्य करून जयंत पाटील यांना घेरण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून सुरू होते. मात्र, या विषयांकडे दुर्लक्ष करत जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून होमग्राउंडवर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे.
जयंत पाटलांनी टाकला डाव...
आनंदराव मलगुंडे हे जयंत पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या आरक्षणात नगराध्यक्षपदाची जागा ही ओबीसी पुरुष उमेदवारासाठी आरक्षित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आनंदराव मलगुंडे यांना ही उमेदवारी दिली आहे. आनंदराव मलगुंडे हे धनगर समाजातील सर्वसामान्य व्यक्तीमत्व आहेत. शिवाय मलगुंडे यांनी याधीही नगराध्यक्ष पद सांभाळले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाने पुन्हा एकदा अनुभवी व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.
