राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्ह्यांतील नगरपालिका आणि नगरपंचायतीतील ३५ जागांवरील निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्या आहेत. त्यामुळे २ डिसेंबर रोजी होणारे मतदान रद्द झाले आहे.
> निवडणूक स्थगित करण्याचे कारण काय?
छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांविरोधात संबंधित ३५ जागांवरील उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर २५ नोव्हेंबरपर्यंत निकाल लागणे अपेक्षित होते; मात्र अंतिम निर्णय न झाल्याने पुढील कार्यवाही ठप्प झाली आहे. न्यायालयाचे आदेश न मिळाल्याने या प्रभागांमध्ये उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटपच शक्य नसल्याने मतदान अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
advertisement
> कोणत्या जिल्ह्यातील ३५ जागांवर निवडणूक स्थगित...
अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, गोंदिया, जालना, लातूर, नांदेड, परभणी, पुणे, सोलापूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील जागांवरील मतदानाला स्थगिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना या निर्णयाची अधिकृत माहिती पाठवली आहे.
> राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं काय होणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट गडद झाले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून, न्यायालय कोणता मार्ग ठरवते याकडे राज्यभरातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण अंतरिम आदेशांच्या यादीत समाविष्ट असल्याने काही तात्पुरते आदेश देण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
