मागील काही वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या प्रभाग आरक्षण सोडतीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या सोडतीमुळे काही निवडून आलेल्या दिग्गजांचा प्रभाग आरक्षित होऊन पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारीसाठी पक्षांतर्गत संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे, काही प्रभागांत माजी नगरसेवकांना एकमेकांसमोर निवडणुकीच्या रणांगणात उतरावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलू शकतात.
advertisement
आक्षण सोडतीनंतर राजकारण रंगणार...
आरक्षण सोडतीनंतरचे चित्र स्पष्ट झाल्यावर महापालिकांतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. या सोडतीनंतर काही ठिकाणी इनकमिंग-आउटगोईंग वाढण्याची शक्यता आहे. आपला वॉर्ड महिला आरक्षित झाल्यास त्या ठिकाणी पत्नीलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी काही माजी नगरसेवकांनी केली आहे. तर, काही जणांनी पर्यायी वॉर्डची तयारी सुरू केली आहे.
महामुंबईत ९ महापालिकांसाठी सोडत
मुंबईसह महामुंबईतील ९ महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या महापालिकांचा समावेश आहे. त्याशिवाय पनवेल, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिकांसाठीदेखील आरक्षण सोडत निघणार आहे.
