बब्बू शेख (प्रतिनिधी) मालेगाव : राज्यभरात महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचून आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असताना मालेगावमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मतदानाच्या तोंडावर एमआयएमच्या उमेदवारावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
मालेगाव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधून एमआयएमकडून निवडणूक लढवणारे उमेदवार विशाल आहिरे यांच्यावर रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात आहिरे यांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या असून, सुदैवाने ते या घटनेतून सुखरूप बचावले. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल आहिरे हे आपल्या पोलिंग एजंट्सची बैठक आटोपून घरी परतत होते. त्याच वेळी मुंबई–आग्रा महामार्गावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. हल्लेखोरांनी थेट आहिरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र, प्रसंगावधान राखत विशाल आहिरे यांनी आपली गाडी वेगाने सायनेगावच्या दिशेने नेत घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि त्यांचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, मालेगाव महानगरपालिका निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, इस्लामिक पार्टी आणि एमआयएम यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये इस्लामिक पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत ‘मालेगाव सेक्युलर फ्रंट’ची स्थापना केली असून, हा आघाडी ८४ जागांवर उमेदवार उभे करत आहे.
या निवडणुकीत स्थानिक विकासाचे प्रश्न, पायाभूत सुविधा, प्रशासकीय कारभार, तसेच धार्मिक आणि राजकीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. उमेदवारांची संख्या पाहता, एमआयएमकडून ५७, इस्लामिक पार्टीकडून ४६, समाजवादी पार्टीकडून २०, भाजपकडून २५, शिवसेनेकडून २४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून ५ उमेदवार मैदानात आहेत.
