पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, गायत्री तुषार सावंत (वय २६, व्यवसाय – नृत्यांगना, मूळ रा. वाघोली, जि. पुणे, सध्या रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, जि. अहिल्यानगर) ही तिची मैत्रीण मनिषा प्रकाश जावळे हिच्यासोबत जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहते. गायत्री सावंत ही नृत्यांगनेचे काम करून आपली उपजीविका भागवते. फिर्यादी गायत्री सावंत हिचे आरोपी राहुल अशोक कचरे (राहणार तालुका गेवराई, जि. बीड) याच्याशी गेल्या पाच वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. मात्र २०२४ सालापासून हे संबंध तुटले होते. यापूर्वीही फिर्यादी महिलेनं आरोपीविरोधात एक गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता आरोपी राहुल कचरे याने फिर्यादी महिलेला फोन करून “तू माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. जर तू, बोलली नाहीस तर तुला मारून टाकीन,” अशी धमकी दिली होती.
advertisement
माझा नंबर ब्लॉक का केला म्हणत कोयत्याने हल्ला
यावेळी फिर्यादीने त्याचा फोन कट केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजेच्या सुमारास गायत्री सावंत ही तिच्या रूममध्ये मैत्रीण मनिषा जावळे हिच्यासोबत असताना, मनिषा बाल्कनीत गेली असता आरोपी राहुल कचरे हा तिथे दबा धरून बसलेला होता. त्यानंतर तो कोयता हातात घेऊन फिर्यादीच्या रूममध्ये घुसला. “तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?” असं म्हणत त्याने फिर्यादी महिलेच्या बोटांवर, हातावर आणि डोक्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केलं.
आरोपी फरार, शोध सुरू
यावेळी मैत्रीण मनिषा जावळे हिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत मारू नको, अशी विनंती केली. मात्र आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत “मी तुला संपवून टाकणार आहे,” अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी गायत्री तुषार सावंत हिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल अशोक कचरे याच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत.
