नेमकी घटना काय?
खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर परिसरात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले होते. मंगेश काळोखे यांचे पुतणे राज निलेश काळोखे यांनी खोपोली पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली.
advertisement
पोलिसांसमोर होते मोठे आव्हान
हत्या केल्यानंतर आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद केले होते, ज्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरले होते. आरोपी मुंबईच्या दिशेने आणि इतर विविध ठिकाणी पळून गेले आणि अंडर ग्राऊंड झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेतला आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.
आरोपींना पकडण्यासाठी रायगड पोलिसांनी विशेष नियोजन केलं होतं. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एकूण पाच पथकं तयार केली होती. यामध्ये खोपोली पोलीस पथक, खालापूर पोलीस पथक, रसायनी पोलीस पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB आणि नेरळ पोलीस पथकाचा समावेश होता. या पाचही पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकून अखेर ९ आरोपींना ताब्यात घेतले. फिर्यादीत नाव असलेल्या आरोपींव्यतिरिक्त, त्यांना पळून जाण्यास आणि लपण्यास मदत करणाऱ्या इतर साथीदारांनाही पोलिसांनी निष्पन्न करून अटक केली आहे.
मंगेश काळोखे हत्या प्रकरणात कुणाला अटक झाली?
रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, उर्मिला रवींद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार असं अटक केलेल्या नऊ आरोपींची नावं आहेत. मुख्य आरोपींसह त्याला मदत करणाऱ्या आरोपींना अटक केल्याने आता या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. मंगेश काळोखे यांना का मारलं? या प्रश्नाचं उत्तर देखील लवकरच मिळू शकतं. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.
