मुंबई : राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सदनिका घोटाळा प्रकरणात कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तर, दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळातून आता माणिकराव कोकाटे यांची गच्छंती होण्याची शक्यता बळावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत फडणवीसांनी कोकाटे यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
सदनिका घोटाळा प्रकरणात सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने 16 नोव्हेंबर रोजी याबाबतचा निकाल दिला होता. त्यानंतर आता कोकाटे यांना आमदारकी गमवावी लागण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका आणि माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजितदादांना थेट विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे.
सीएम फडणवीस-अजित पवार भेटीत काय झालं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज झालेल्या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माणिकराव कोकाटे प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणातील पुढील निर्णयाचा चेंडू अजित पवारांकडेच टाकत, “राजीनाम्याबाबतचा निर्णय तुम्हीच घ्या,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांनी दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंचे खाते नेमके कोणाला द्यायचे, तेही सांगा, असा थेट प्रश्न अजित पवारांना विचारल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, हायकोर्टाकडून निर्णयाला स्थगिती मिळाल्यासच माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद वाचू शकते. मात्र, तसे न झाल्यास मंत्रिपद रिक्त झाल्यानंतर संबंधित खाते कुणाकडे सोपवायचे, याबाबतचा निर्णय आधीच घ्यावा लागेल, असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीत दिल्याची माहिती आहे.
नेमकं प्रकरण काय?
सुमारे ३० वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी नाशिक शहरात अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. त्यांनी स्वतःसह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या. तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर सरकारकडून तक्रार देण्यात आली होती, जिल्हा प्रशासनानेही चौकशी केली होती.
या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी (दि. १७) जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच न्यायालयाने त्यांच्या अटकेचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
