मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरूवात झाली असून शनिवारी पहिल्याच दिवशी उपोषणस्थळी आंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी झाली होती. सगेसोयरे कायदा अंमलबजावणीसाठी जवळपास एक वर्ष लागलं. एक वर्षापासून समाज रस्त्यावर आहे. आजही मराठे त्याच ताकदीने उभे आहेत. आमच्या त्रासाची जाण सरकारला नाही. सरसकट कुणबी प्रमाण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या पहिल्या दिवशी केली होती. राज्य सरकारने मराठ्यांशी बेईमानी आणि हद्दारी करू नये. आज जरी केवळ आंतरवालीत उपोषण सुरू झालेले असेल तरी सामूहिक आंदोलनाचे लोण आता राज्यात पसरेल असा इशाराही त्यांनी दिला.
advertisement
मनोज जरांगेंचे अस्तित्व संपलं....
मनोज जरांगे आता स्वत: चं अस्तित्व टिकवण्यासाठी लढत असल्याचं म्हणत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर टीका केली. सुरेश धस हे मराठा समाजाचे नेते झाले आहेत. त्यामुळं जरांगेंना झोप येत नाही. स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी जरांगेंनी आता हे उपोषण सुरू केलं असल्याची टीका वाघमारेंनी केली. उपोषण स्थळी आधी लाखोनं लोकं यायची मात्र आता फक्त 100-200 लोकं येतात. त्यामुळं जरांगेंची क्रेज संपलेली असून मराठा समाजाचे नेते हे सुरेश धस झालेले आहेत असेही वाघमारे यांनी म्हटले.
जरांगेंच्या उपोषणातील मागण्या काय?
सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी तातडीने लागू करा. कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांना आरक्षण द्यावे, सगळ्या सगे सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे त्यामुळे मागेपुढे न पाहता कुणबी दाखले दिले जावेत, न्यायमुर्ती संपत शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, दाखल्यांसाठी विशेष कक्ष पुन्हा सुरु करा, आंदोलकरांवरील गुन्हे मागे घ्या, सातारा-औंध-मुंबई-हैद्राबाद गॅझेट लागू करा तसेच आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबाला निधी आणि शासकीय नोकरी द्या, अशा १० मागण्या जरांगे यांनी राज्य शासनाकडे केल्या.
