दौंड, 16 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर दौरा करणारे मनोज जरांगे पाटील दौंडच्या पाटसमध्ये आले आहेत. इकडे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभा घेत पुन्हा एकदा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला. काही लोक म्हणत आहेत, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, मला सांगा कुणबी म्हणजे शेतकरी, मग शेतकरी म्हणून घ्यायला लाज वाटते का? ज्याला कुणबी, शेतकरी शब्दाची ऍलर्जी आहे, त्याने आपलं शेत विकावं आणि चंद्रावर राहायला जावं, ज्याला आरक्षण नको, तू येऊ नको, खुशाल घरी झोप, पण आमच्या अन्नात माती कालवू नको, असा हल्ला मनोज जरांगे पाटील यांनी केला.
advertisement
'मराठ्यांना इतक्या ताकदीने एकत्र येण्याची गरज का पडली? मराठ्यांचे पुरावे नसल्यामुळे कुणबी दाखले मिळत नाहीत. 70 वर्षांपासून पुरावे सरकारने स्वत:च्या बुडाखाली अडवून ठेवले आहेत. ओबीसी असतानाही मराठ्यांना आरक्षण का नाही? का तर पुरावे नाही म्हणून. आता न्यायमूर्ती शिंदे समितीने पुरावे शोधायला सुरूवात केली, दोन महिन्यात लाखाने पुरावे मिळाले आहेत. मग आमचे पुरावे 70 वर्ष कुणी दडवून ठेवले?' असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.
'ओबीसी नेत्यांच्या प्रभावामुळेच मराठ्यांचे पुरावे बाहेर आले नाहीत, आरक्षण नसल्याने मराठ्यांच्या पोरांची राख रांगोळी झाली, पण आता 24 डिसेंबरला आरक्षण घेणारच. आमच्या शक्तीमुळेच सरकार झुकलं आणि समिती कामाला लागली. समितीने पहिले काहीच काम केलं नाही, आता कसे पुरावे सापडले मग? या आरक्षणाने आमचा घात केला, मुलांची करिअर उद्धवस्त झाली. मायबाप फक्त बघतच राहिले. मराठ्यांनी फक्त काबाडकष्टच कयारच का, इथे कुणीही मजा घेण्यासाठी आलेला नाही. इथं बसलेला प्रत्येक जण स्वत:ची वेदना घेऊन आलाय. आता आपण 70 टक्के लढा जिंकलो आहे. मी सध्या त्यांचं नाव घेत नाही, पण तो आडवा आला असता तर मग बघा,' असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसंच सरकारने 24 तारखेपर्यंत आरक्षण देतो, म्हणून गावबंदी उठवली आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
