मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निर्णायक आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याआधी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना संबोधित केले. जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना आवाहन करताना म्हटले की, कोणीही कितीही डिवचलं तरी शांत राहायचं, कोणीही दगडफेक, हिंसाचार करायचे नसल्याचे त्यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, खोट्या हिंदूंकडून खऱ्या हिंदूंना त्रास दिलाय जातोय. आम्ही हक्क मागण्यासाठी मुंबईत जात आहोत, कोणताही धिंगाणा, दंगल करायला जात नाही. तरीही आमची अडवणूक कशाला करताय असा प्रश्न जरांगे यांनी केला. तुम्ही हिंदूविरोधी काम का करताय, हिंदुत्वाशी ज्यांचं देणंघेणं नाही, त्यांच्याकडून अडवणूक सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी सरकारवर केला. सणावाराच्या दिवशी हिंदूंना त्रास देण्यासाठीच पंतप्रधान मोदी आणि शाह यांनी मुख्यमंत्रीपदी फडणवीसांना बसवले का, असा सवाल जरांगे यांनी केला.
advertisement
सणासुदीच्या दिवसात सरकारलाच वातावरण खराब करायचं आहे. मोर्चाबाबत आणि आपल्या मागण्यांबाबत सरकारला सांगून चार महिने झाले आहेत. तरीही कोणतीही हालचाल नाही. हे सरकार इंग्रजांपेक्षा वाईट आहे इंग्रजांनी अडवणूक केली नाही तेवढी अडवणूक सरकारकडून सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी केले.
गणेशोत्सवाच्या नावाखाली सरकारने डाव साधला असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. चूक लपवण्यासाठी देवाचा आधार घेतला जात आहे. आम्ही देखील हिंदू आहोत, सण-उत्सव आम्हीदेखील साजरे करतो. पण आम्हाला मोर्चासाठी परवानगी नाकारत आहेत. आपल्या लढ्याला सगळ्यांचा पाठिंबा आहे, दलित मुस्लिम ओबीसी सगळ्या घटकांचा पाठिंबा असल्याचे पाटील यांनी सांगितले.
