धाराशिव : मराठा आरक्षणाच्या रॅलीसाठी मनोज जरांगे पाटील धाराशिवमध्ये आले होते. या रॅलीला संबोधित करताना जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्ला केला आहे. एखाद्या लढाईमध्ये माघार घेत नाही, मरण पत्करू पण माघार घ्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, फक्त ओबीसीमधूनच आरक्षण घेणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
'आपल्याला या रॅल्या काढाव्या लागल्या, त्यामागे छगन भुजबळ आहे. गरीब मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावतील, भांडण करू नका. सरकारचं कामच आहे भांडण लावायचं. सरकारने सगळं बळ भुजबळांना दिलं आहे', असा आरोप जरांगे यांनी केला आहे.
advertisement
मनोज जरांगे यांची सभा सुरू असताना तिकडे कुत्रा आला असता त्याला जरांगेंनी भुजबळांची उपमा दिली. 'त्याला माझ्याकडेच यावं लागेल, त्याला पर्याय नाही, याच्यासारखीच त्याची अवस्था होणार', असा टोला जरांगे पाटलांनी लगावला. ज्या नोंदीला कायद्याने मान्यता दिली, त्या नोंदी रद्द करा, अशी मागणी भुजबळांनी केली. ज्या संविधानाने पदावर बसवले, त्या पदाचा गैरवापर करत आहे, अशी टीका जरांगेंनी केली.
'जातीवादाचं उत्तम उदाहरण म्हणजे छगन भुजबळ. ओबीसींना आरक्षण दिलं त्याची एकही नोंद भारत भरात नाही. एकमेव जात मराठा आहे, ज्याची नोंद आहे. एकही नोंद रद्द करून दाखवा. गाठ मराठ्याशी आहे. धनगर बांधवांना आवाहन आहे, आमचं तुमचं वैर होऊ शकत नाही. तुमच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण छगन भुजबळ भांडण लावत आहे', असंही जरांगे पाटील म्हणाले.
'भुजबळांना म्हणलं होतं, नादाला लागू नको. ओबीसीमध्ये सगळे एकत्र आले की जातीवाद नाही, मराठे एकत्र आले की जातीवाद. भुजबळांच्या विरोधात राज्यातील अख्खा भाजप संपवून टाकेन. फडणवीस साहेब आम्ही कुठे जातीवाद केला? फुटकचं आरक्षण वापरलं भुजबळने 16 टक्के. फडणवीस साहेब भुजबळांच्या माध्यमातून जातीवादाचा आरोप मराठ्यांवर लावू नका. एकही नोंद रद्द केली तर राज्यातील सगळे रस्ते बंद पाडा', असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
भुजबळांसोबतच जरांगेंनी गिरीश महाजन यांच्यावरही हल्लाबोल केला. 'ज्या आंदोलनामध्ये जातात तिथे वाटोळं करतात. अण्णा हजारेंच्या आंदोलनातही तसंच केलं, त्याच्या बाबत मला माहित होते, त्याने जे डाव टाकले ते मला माहिती होते', असा आरोप जरांगेंनी गिरीश महाजनांवर केला आहे.