सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी गावात मतपत्रिकेवर आज मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. ग्रामस्थांच्या या निर्णयावर प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात 5 डिसेंबरपर्यत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया सुरू केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. अखेर मारकडवाडीतील बॅलेटवरील मतदान प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.
advertisement
उत्तम जानकर आणि पोलिसांची चर्चा
मारकडवाडीमध्ये पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांची चर्चा झाली. आमदार उत्तम जानकर यांच्याशी देखील पोलिसांनी चर्चा केली. पोलीस प्रशासन व उत्तम जानकर यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी पोलिसांनी सहकार्य करत मतदान प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली. एक देखील मतपत्रिका फाडली तर गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाकडून उत्तम जानकर यांना सांगण्यात आले.
फेरमतदान प्रक्रिया रद्द...
ग्रामस्थ आणि पोलीस, प्रशासनाचा संघर्ष टाळण्यासाठी जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर मतपत्रिकेवरील मतदान प्रक्रिया स्थगित करण्याची घोषणा जानकरांनी केली.
जमाबंदीच्या आदेश असल्याने आणि प्रशासनाचा दबाव असल्याने आम्ही वेगळ्या मार्गाने न्याय मिळवू, असे आमदार उत्तम जानकर यांनी म्हटले. शालेय मुलांचे आणि इतर कोणाचाही नुकसान होऊ नये, गावाची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या 15 दिवसात ईव्हीएम बाबतचे सर्व पुरावे देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
फेरमतदान कशाला?
जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएमचे कटकारस्थान असल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. मारकडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने 80 टक्के मतदान झाल्याचा दावा ग्रामस्थांनी व्यक्त केला. मात्र, ईव्हीएममधून वेगळीच आकडेवारी समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांना 843 तर जानकर यांना 1003 मते मिळाली आहेत. या मतदानावर गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवून ईव्हीएमची पोलखोल करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. सातपुते गावातून फारतर शे-दीडशे मते मिळायला पाहिजे होती, असे ग्रामस्थांनी सांगितले.