मराठी अस्मिता मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट लक्ष घातले आहे. त्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) यांच्याकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांद्वारे समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांना विचारले आहे की, मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू कुणाचा होता? याचा सखोल तपास करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मोर्चेकऱ्यांनी सरकारवर आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. "हे सरकार महाराष्ट्राचं आहे की गुजरातचं?" असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता.
advertisement
मराठी अस्मिता मोर्चाला अटकाव केल्यानंतर ठाणे, मुंबईसह राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या घडामोडींनंतर सरकारमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. बिगर मराठी व्यापाऱ्यांना मोर्चा काढण्यास परवानगी देण्यात आली. पण, मराठी माणसाला अटकाव का, असा सवाल उपस्थित होऊ लागला. त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहे.