ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मराठी महापौराच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीच्या सूरात सूर मिसळला. सगळ्याच पक्षातून निवडून आलेल्या नगरसेवकांना शुभेच्छा देतो पण महापौरपदाचा विषय येतो तेव्हा मात्र भूमिपुत्रालाच न्याय दिला जावा, अशी आग्रही भूमिका अविनाश जाधव यांनी मांडली.
अविनाश जाधव काय म्हणाले?
मराठी महापौर बसवला गेला नाही तर रक्ताचा सडा पडेल. मात्र हे रक्त मराठी माणसाचे नसेल, असे अविनाश जाधव म्हणाले. विकासकामांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आपल्याला पाठिंबा असेल पण महाराष्ट्रात मराठीच महापौर बसवला जावा, अशीच आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि हे तुम्हाला पाळावेच लागेल, असे अविनाश जाधव म्हणाले.
advertisement
भाजपमध्येही मराठी लोक निवडून आलेत, भूमिपुत्रांना संधी द्या- अविनाश जाधव
अविनाश जाधव यांनी स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांना आवाहन करत सांगितले की, यावेळी तुम्ही बहुमताने निवडून आला आहात, मात्र महानगरपालिकेच्या महापौरपदी मराठी व्यक्तीच बसली पाहिजे. भारतीय जनता पक्षामधूनही मराठी लोक विजयी झाले आहेत. त्यापैकी कुणालाही संधी द्यावी. शेवटी भूमिपुत्रांना न्याय दिला जावा, अशी मनसेची भूमिका असल्याचे अविनाश जाधव म्हणाले.
मराठी एकीकरण समितीचा इशारा काय?
मिरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले आहे. भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेत आला आहे. आता पुढच्या काही दिवसांत महापौरपदी कोण बसणार, हे निश्चित होईल. असे असताना जर मिरा भाईंदरमध्ये अमराठी व्यक्ती महापौरपदी बसला तर रक्ताचा सडा पडेल. मिरा भाईंदरमध्ये महापौरपदी मराठी माणूसच बसला पाहिजे. जर कुणी वेगळा विचार केला तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या पद्धतीने लढला गेला, तसाच लढा आम्हीही लढू, असा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे.
