या मेळाव्या दरम्यान माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी जर बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण दिलं नाही तर सर्व बंजारा समाज हा हिंदू धर्मातून बाहेर पडून नवीन उपहिंदू धर्मात सामील होईल, अशा आशयाचे वक्तव्य केले. तसेच बंजारा ब्रिगेडचे अध्यक्ष रविकांत राठोड यांनी देखील असेच वक्तव्य केलं होतं. या दोघांच्या वक्तव्यामुळं बंजारा समाजात मोठा रोष व्यक्त होत आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर पोहरादेवी या धर्मपिठाचे धर्मगुरु आणि महंत यांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि रविकांत राठोड यांना शिक्षा सुनावली आहे.
advertisement
हरिभाऊ राठोड यांनी पोहरादेवी येथील जगदंबा देवी,सेवालाल महाराज, बाबनलाल महाराज यासह इतर मंदिरांची झाडू मारून स्वच्छता करावी. तसेच रविकांत राठोड यांनी एक दिवस सर्व मंदिरावर भाविकांच्या पाण्याची सोय करावी. जर दोघांनी ही सुनावलेली शिक्षा पूर्ण केली नाही तर त्यांना पोहरादेवी इथं येण्यास बंदी घालण्यात येईल असं पोहरादेवी चे महंत सुनील महाराज यांनी सांगितलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते हरिभाऊ राठोड?
बंजारा समाजाची कशी असलेल्या पोहरादेवी येथे प्रथमच बंजारा समाजाचा दसरा मेळावा पार पडला. गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी या मेळाव्यातून पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. आम्हाला हिंदुत्ववादी सरकारने न्याय दिला नाही तर बंजारा समाज हिंदू धर्म सोडून उपहिंदू बनेल, असं वक्तव्य माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केलं. तर 16 ऑक्टोबला मुंबई ठप्प करणारा मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
बंजारा समाजाकडून पहिल्यांदाच दसरा मेळाव्याचे आयोजन
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या प्रमुख मागणीवर या मेळाव्यातून चर्चा झाली. दसऱ्याच्या या मेळाव्यातून समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा व ठोस आंदोलनात्मक रूपरेषा निश्चित करण्यात आली.यावेळी बंजारा समाजातील महंत,धर्मगुरू सह राज्यातील जानकर तसेच बंजारा समाजातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन पुढील संघर्षाची रणनिती आखण्यात आली.