लालपरीचा प्रवास आता अधिक विश्वासार्ह
राज्यभरातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एकूण 633 ठिकाणी 7,035 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून यासाठी सुमारे 111 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या लालपरीच्या सुरक्षेला यामुळे भक्कम तांत्रिक कवच मिळणार आहे.
पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील 64 महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा यशस्वीरित्या सुरु करण्यात आली आहे. या टप्प्यामुळे सुरक्षाव्यवस्थेला नवी दिशा मिळाली असून उर्वरित 27 विभागांमध्ये तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये कॅमेरे बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
advertisement
या संपूर्ण योजनेचा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाची वापरकर्ता स्वीकृती चाचणी पूर्ण झाली असून राज्यभरातील सर्व कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवता येणार आहे. संशयास्पद हालचाली त्वरित ओळखून आवश्यक ती कार्यवाही करण्याची सुविधा या प्रणालीमुळे उपलब्ध होणार आहे.
नेमक्या कोणत्या परिसरात बसवणार सीसीटीव्ही?
नवीन सीसीटीव्ही जाळे बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत उभारले जाणार आहे. बसस्थानके, आगार, विभागीय आणि मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच भोसरी येथील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था अशा संवेदनशील ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन इंडिया लिमिटेड या संस्थेकडे प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 1 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
हा उपक्रम केवळ कॅमेरे बसविण्यापुरता मर्यादित नसून एसटीच्या सुरक्षाव्यवस्थेला डिजिटल बळकटी देणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
