कोकणवासीयांना शिमगा, गणेशोत्सव आणि इतरत्र सुट्टीच्या दिवसांत कोकणात जात असताना ट्रॅफिकचा सामना करावा लागायचा. पण आता हा सामना करावा लागणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई- गोवा महामार्गावरील रखडलेल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे काम आता लवकरच मार्गी लागणार आहे. ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर या दोन ठिकाणच्या बायपासचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून 1 जूनपर्यंत हे दोन्हीही बायपास वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ही महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाला इतकी दिरंगाई का?
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर ही दोन शहरं वाहतूक कोंडीसाठी ओळखली जातात, मात्र आता या बायपासमुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीच्या त्रासातून कायमची सुटका होणार आहे. दरम्यान, कोकण रेल्वेच्या विद्युत पोलमुळे बायपासच्या कामांमध्ये अडथळे येत होते. आता ते अखेर सर्व अडथळे दूर करत लवकरच बायपासचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोकण रेल्वेच्या कामामध्ये येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी कायदेशीर पूर्तता करण्याचा निर्णय खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत घेतला आहे. यानंतर कोकणवासीयांचा प्रवास अधिकच सुखकर होणार आहे. बैठकीमध्ये नियोजन झाल्याप्रमाणे सर्व काही कामे पूर्ण झाल्यास मुंबई- गोवा महामार्ग 1 जूनपासून सुरू होणार आहे.
