मी वाचले, पण माझ्यासोबत रोज कामाला येणारी माझी मैत्रीण वर्षा कायमची सोडून गेली," हे सांगताना रोशनीच्या डोळ्यात अश्रू होते. ती ढसाढसा रडत होती. नागपुरातील स्फोटक कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेनं तिची अक्षरश: झोप उडाली.
पाण्यानं तिला पुनर्जन्म दिला होता. तहान लागली म्हणून ती बाहेर आली आणि मृत्यूलाच जणू तिनं हुल दिली. रोशनी मसरामने अंगावर काटा आणणारी कहाणी सांगितली. घटनेच्या वेळी एका युनिटमध्ये साधारण ३० कामगार असतात. त्यापैकी २० जण मशीनवर आणि १० जण डिटोनेटर्स मोजण्याचं काम करत होते. रोशनी मसराम या कामाच्या व्यापातून दोन मिनिटे पाणी पिण्यासाठी बाहेर आली आणि त्याच वेळी काळाने घाला घातला.
advertisement
रोशनीचा जीव वाचला असला, तरी तिच्या डोळ्यांसमोर अनेक मैत्रिणींना मृत्यूने कवटाळले. वर्षा टेकाम तिच्या जीवलग मैत्रिणीला तिने या दुर्घटनेत गमावलं, तिची उणीव कुणीच भरुन काढणारं नाही. या दुर्घटनेचा मोठा मानसिक धक्का तिला बसला आहे.
गेल्या ३० वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मंदा कोटरंगे यांनी सांगितले की, सकाळी ८.३० च्या सुमारास जेव्हा रुग्णवाहिकेतून जखमींना आणणं सुरू झालं, तेव्हा त्यांचे हाल पाहून अंगावर काटा आला. "स्ट्रेचरवरून त्यांना आत नेण्याची हिंमत होत नव्हती, इतकी भयानक अवस्था होती," असं त्यांनी सांगताना २० वर्षांतील ही सर्वात मोठी दुर्घटना असल्याचं म्हटलं.
जिलेटिन आणि डिटोनेटर्स हाताळताना कामगारांच्या मागे सुरक्षेसाठी 'वाळूची पोती' ठेवणे अनिवार्य असते, जेणेकरून स्फोट झालाच तर त्याची तीव्रता कमी व्हावी. मात्र, या कंपनीत अशी कोणतीही सुरक्षा मानके पाळली गेली नसल्याचा आरोप होत आहे. या कंपनीत काम करणाऱ्या महिला आजूबाजूच्या ग्रामीण भागातील आहेत.
नवीन कामगारांना अवघा १३ ते १५ हजार रुपये पगार मिळतो, तर जुन्या कामगारांना १७ ते २० हजारांपर्यंत वेतन दिलं जात होतं. नागपुरात रविवारी झालेल्या स्फोटात १८ जणांचा बळी गेला असून या संपूर्ण घटनेची चौकशी होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
