नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीच्या तिसऱ्या दिवशी नारा परिसरातील साई ले-आऊटजवळ असलेल्या एका शेतात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने पोलिसांसमोर मृताची ओळख पटवणं आणि खुनाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान होतं. मात्र, पोलिसांनी तपासचक्र वेगानं फिरवून या प्रकरणाचा छडा लावला.
४८ तासात खुनाचा उलगडा
advertisement
राजेंद्र ऊर्फ रज्जू यादव (वय ४५), रा. छपारा, मध्य प्रदेश असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो व्यवसायानं मजूर आहे. त्याचे दासिया उईके (वय ३५) नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रज्जूला तिच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून होळीच्या रात्री दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात रज्जूने दासियाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती की, दासियाच्या पोटावर गंभीर मार लागल्याने तिच्या गर्भाची पिशवी फुटली आणि अंतर्गत रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
शेतकऱ्याला दिसला कुजलेला मृतदेह
दासियाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच रज्जू घाबरला. त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेतात नेऊन टाकला आणि तिची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तिथून फरार झाला. काही दिवसांनी शेतमालक तळेकर हे तुरीचे खळे करण्यासाठी शेतात गेले असता, त्यांना उग्र दर्प आला. त्यांनी आसपास शोध घेतला असता त्यांना कुजलेला मृतदेह दिसला आणि त्यांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली.
आधी शरीरसंबंध मग हत्या
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाबी समोर आल्या. महिलेचा मृत्यू मारहाणीमुळे झाला असून तिच्या ओटी पोटात गंभीर दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. तसेच घटनेपूर्वी शारीरिक संबंध ठेवल्याचेही समोर आलं. या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी रज्जूला शोधून काढले. जरीपटका पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत या गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
