नागपूर: जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण औद्योगिक अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. येथील अवाडा कंपनीच्या प्रकल्पस्थळी सुरू असलेल्या बांधकामादरम्यान उभारण्यात येणारा उंच टँक टॉवर अचानक कोसळला. या दुर्घटनेत सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
advertisement
ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन बुटीबोरी एमआयडीसी भागात घडली. पाण्याच्या टाकीसाठी उभारण्यात येणाऱ्या टँक टॉवरचे काम अंतिम टप्प्यात असताना अचानक मोठा आवाज झाला आणि क्षणार्धात संपूर्ण संरचना जमीनदोस्त झाली. टॉवर कोसळताच परिसरात प्रचंड धूळ आणि मलबा पसरला, त्यामुळे कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व कामगार हे बिहार राज्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये 28 ते 42 वयोगटातील मजुरांचा समावेश असून, हे सर्वजण अवाडा कंपनीच्या प्रकल्पावर काम करत होते. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांना तातडीने रुग्णवाहिकांच्या मदतीने बुटीबोरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून, उर्वरित जखमींवरही उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. कोणतीही पुढील दुर्घटना घडू नये यासाठी संपूर्ण परिसर तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता.
प्राथमिक माहितीनुसार, अवाडा कंपनीत सौर पॅनल उत्पादनाशी संबंधित प्रकल्पाचे काम सुरू होते. टँक टॉवरच्या बांधकामादरम्यान त्याचा समतोल बिघडल्याने हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांधकामातील निष्काळजीपणा, तांत्रिक दोष किंवा सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन झाले का, याचा सखोल तपास करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
या दुर्घटनेनंतर औद्योगिक क्षेत्रातील कामगार सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये काम करताना सुरक्षाविषयक उपाययोजना कितपत प्रभावीपणे राबवल्या जातात, यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारतर्फे मृत कामगारांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच संबंधित कंपनीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 30 लाख रुपये, तर जखमींना 10 लाख रुपये आणि संपूर्ण उपचार खर्च देण्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
