नेमकी घटना काय?
सुप्रिया कानडे (३५) या आपल्या आईसोबत राहत होत्या. त्यांचे पती सध्या गावी गेले असल्याने घरात त्या आणि त्यांचा भाऊ अजित मालुष्टे (४०) हे होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास बहीण-भावामध्ये कोणत्या तरी कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात अजितने घरातील कोयता काढून सुप्रिया यांच्या मानेवर आणि छातीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की सुप्रिया यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
आईचीही प्रकृती चिंताजनक
बहीण-भावाचे भांडण सोडवण्यासाठी वृद्ध आई मध्यस्थी करायला आली असता, संतापलेल्या अजितने आईवरही हल्ला चढवला. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली असून त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
आरोपी मानसिक रुग्ण?
स्थानिक रहिवासी महेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाचच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली तेव्हा सुप्रिया रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अजित मालुष्टे हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त होता.
दरम्यान, वसई-विरार शहरात गेल्या आठवडाभरात झालेली ही चौथी हत्या आहे. तुळींज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
