काय आहे नेमकं प्रकरण?
नाशिकचे संदीप पाटील यांनी तक्रार दिली होती की, गोव्यातून कर्नाटक राज्यात २ हजार रुपयांच्या नोटांचा (सुमारे ४०० कोटी रुपये) भरलेला कंटेनर घेऊन जात असताना त्याची चोरी झाली. या चोरीचा संशय घेऊन संदीपा पाटील यांचे अपहरण करण्यात आले होते. या खळबळजनक आरोपामुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती.
advertisement
तपासाचे चक्र आणि किशोर सावळांचे नाव
संदीप पाटील यांच्या अपहरण प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून किशोर सावळा यांचे नाव समोर आले होते. ६ आरोपींना अटक करण्यात यश मिळवणाऱ्या पोलिसांना सातवा आरोपी किशोर सावळा मात्र गुंगारा देत होता. अखेर, पोलिसांचा वाढता दबाव आणि तांत्रिक तपासाच्या फासामुळे सावळा स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले आहेत.
४०० कोटींचे कोडं उलगडणार?
किशोर सावळा यांच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. त्या कंटेनरमध्ये ४०० कोटींची रोख रक्कम होती का, ती कोणाची होती? नोटांच्या चोरीचे मूळ सूत्रधार कोण आहेत? या प्रकरणात आणखी कोणत्या बड्या हस्तींचे हात गुंतले आहेत? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.
पोलिस आज किशोर सावळा यांना न्यायालयात हजर करणार असून, त्यांची पोलीस कोठडी मागणार आहेत. त्यांच्या चौकशीतून या आंतरराज्यीय चोरीच्या प्रकरणाचा मोठा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
