नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत जाधव दाम्पत्य हे शिवापूर शिवारातील आपल्या शेतातच वास्तव्यास होतं. भगवान जाधव हे शेतीसोबतच मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास या दोघांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या उंबराच्या झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.
सकाळी नेहमीप्रमाणे नातेवाईक शेतात गेले असता, त्यांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत हे दाम्पत्य आढळून आलं. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. नातेवाइकांनी तातडीने दोघांना खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केलं.
advertisement
दोन मुलं झाली पोरकी
मृत भगवान आणि आशाबाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुलं आहेत. ही दोन्ही मुले शिक्षणासाठी सध्या बाहेरगावी राहत असल्याने या भीषण घटनेवेळी ती घरी नव्हती. आई-वडिलांच्या या टोकाच्या पावलामुळे ही दोन्ही चिमुरडी आता पोरकी झाली असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलांच्या भविष्याचा विचार न करता दाम्पत्याने हे पाऊल का उचललं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आत्महत्येचं कारण अस्पष्ट
जाधव दांपत्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरगुती वाद, आर्थिक विवंचना की अन्य काही कारण, याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनेचा सखोल तपास करत आहे.
