नेमकं काय घडलं?
शनिवारी मध्यरात्री टोकडे गावामध्ये जत्रेनिमित्त तमाशाचा फड होता. या कार्यक्रमामध्ये सर्व गावकरी उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरू असताना मध्यरात्रीच्या वेळी एका टोळीने गावकऱ्यांवर हल्ला केला. 8 ते 10 जणांच्या या टोळक्याने लाठ्या- काठ्या आणि धारदार शस्र घेऊन गावकऱ्यांवर हल्ला केला. फक्त गावकऱ्यांवरच नाही तर, घरांवर आणि वाहनांवर सुद्धा त्यांनी हल्ला केला. घरांच्या खिडक्या आणि दारे सोबतच वाहनांच्या काचांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांनी नासधूस केली. त्यांनी केलेल्या नासधूसीमुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
advertisement
अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार
घटनेच्या वेळी पोलीस पाटलांनी तात्काळ मालेगाव तालुक्यातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घटनास्थळावरून बरेच घातक शस्त्रे ताब्यात त्यांनी घेतले. शिवाय, संशयित गुन्हेगारांनाही मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ला करणाऱ्या टोळीने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमध्ये 10 गावकरी जखमी झाले असून जखमींमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. जखमींवर सध्या मालेगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
टोकडे गावातील जखमींमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश असल्याने गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. घटनेनंतर गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. पुन्हा एकदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस गावामध्ये तैनात करण्यात आले आहेत.
