मनसे नाशिकमधून निवडणूक लढणार नाही?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या स्थापनेपासूनच राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये पक्षाची पुरती पडझड झाली आहे, 3 आमदार 1 महापौर आणि 40 नगरसेवक अशी एकाहाती सत्ता नाशिककरांनी राज ठाकरेंचा झोळीत टाकली. मात्र, डॉ प्रदीप पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयानंतर पक्षांतर गटबाजी उफाळून आली. यात डॉक्टर प्रदीप पवार यांचा पराभव झालाच मात्र 3 आमदार, 1 महापौर यांच्यासह 40 नगरसेवकांपैकी 30 ते 35 नगरसेवकांनी मनसेला रामराम ठोकलां. परिणामी नाशिक मधील मनसेचा गड होत्याचा नव्हता झालां. या सगळ्या घटना घडल्या नंतरही नाशिक मधील गटबाजी अद्यापही कायम असल्याने राज ठाकरे यांनी संतप्त होत पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ही गटबाजी थांबली नाही तर आपण निवडणूकच लढणार नाही, असा सज्जड दमच दिला. यालाही राज यांनी दुजोरा देत काल पहिला डोस पदाधिकाऱ्यांना दिल्याची कबुली यांनी दिली.
advertisement
नाशिक मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. एकही निवडणूक न लढलेले पक्षातील पदाधिकारी राज ठाकरेंची कानभरणी करतात आणि चुकीची माहिती पोहचवतात तसेच स्थानिक पातळीवर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वरिष्ठांकडून दबाव येतो, अशी तक्रारही राज ठाकरे यांच्यापर्यंत गेल्याने तुमच्या याच गटबाजी मुळे नाशिकला यावेसे देखील वाटत नाही, अशी हतबल प्रतिक्रिया राज यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केली. दबक्या आवाजात चर्चा बैठकी बाहेरही आली. यावरही राज यांनी 2/4 टाळक्यावर निवडणूक लढणार नाही अशी प्रतिक्रिया देत यावर थेट बोलण टाळलं.
वाचा - विदर्भात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला? 'हा' पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिक मधील पडझड ही पक्षातील मास लीडर नसलेल्या आणि ठेकेदारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कान भरणीमुळे झाल्याची चर्चा आता लपून राहिलेली नाही. पक्षातील पडझड रोखायची असेल तर राज ठाकरेंना हे झारीतील शुक्राचार्य ओळखून त्यांना दूर करत पक्षासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या मास लीडर पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याची गरज आहे, असं मत जाणकार व्यक्त करत आहेत.