अशोक खरात हा आपल्या वडिलांच्या वर्षाश्राद्धाच्या दिवशी देखील अचानक गायब झाला होता. त्याने वडिलांच्या वर्षाश्रद्धानिमित्त आपल्या मूळ गावी कहांडळवाडीत मोठा कार्यक्रम ठेवला होता. कीर्तन भरवलं होतं. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज मंडळी, भक्त लोक आणि गावकरी जमले होते. मात्र या कार्यक्रमातून स्वत: अशोक खरात मात्र गायब झाला होता. यामुळे कार्यक्रमस्थळी विविध चर्चांना उधाण आलं होतं. एका मराठी वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
advertisement
वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमात काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने वडिलांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आपलं मूळगाव कहांडळवाडी इथं आयोजित केला होता. कीर्तनासाठी खास शामियाना उभारण्यात आला होता. तेथे नातेवाईक, आप्तेष्ट जमू लागले होते. व्यासपीठाजवळ खरातच्या वडिलांचा फोटो ठेवण्यात आला होता. सारेच खरातशी बोलत होते. क्षेम कुशल विचारत होते. काही भक्त अशा परिस्थितीतही खरातचे पाय धरून आम्ही आलोय बरं का, याची आठवण करून देत होते. शामियान्यात गर्दी वाढू लागली होती. कीर्तनकारही हजर झाले होते. भजनी मंडळाची लगबग सुरू झाली होती.
कीर्तन सुरू होणार म्हणून सर्वच शामियान्यात बसत होते आणि अचानक खरात उठून आपल्या चारचाकीकडे निघाला. त्यामुळे काही जवळचे भक्त धावतच त्याच्यामागे गेले. शिर्डीला विमान आले असून मला तातडीने दिल्लीला निघायचा निरोप आला आहे. त्यामुळे मला जावं लागतेय, असं म्हणत खरात चारचाकीत बसला आणि चारचाकी सुसाट निघूनही गेली. खरातला भेटण्यासाठी आलेल्या पै-पाहुण्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. खरात नेमका गेला कुठे? त्याला दिल्लीला कुणी बोलावलं? कार्यक्रम सोडून का जावं लागलं? असे अनेक प्रश्न त्यावेळी निर्माण झाले होते.
