पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मनीषा यांचे पती निलेश यांचं एका महिला डॉक्टरसोबत अनैतिक संबंध सुरू होते. याची माहिती मनीषा यांना समजली होती. यातून जेजुरकर दाम्पत्यामध्ये मागील दोन वर्षांपासून वाद सुरू होता. घरात वाद असूनही निलेश यांचं अफेअर बंद होत नव्हतं. उलट या अफेअरमुळे निलेश हा मनीषा यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. याच छळाला कंटाळून मनीषा यांनी शुक्रवारी ७ मार्च रोजी आपल्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement
निलेश जेजुरकर याचं एका महिला डॉक्टरशी सुरू असलेल्या अफेअरमुळे एकूण चार आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. या प्रकरणामुळे मनीषा यांचा जीव तर गेलाच, शिवाय निलेशवरही गुन्हा दाखल झाला आहे. तो सध्या फरार आहेत. तसेच या दाम्पत्याला दोन मुली आहेत. आईचा मृत्यू आणि वडील फरार, यामुळे या दोन्ही मुली देखील पोरक्या झाल्या आहेत.
पोलीस तक्रारीत नेमकं काय म्हटलं आहे?
डॉ. मनीषा यांची बहीण प्रा. रोहिणी थोरात यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत खळबळजनक आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, डॉ. निलेश जेजुरकर हे मनीषा यांचा दीर्घकाळापासून मानसिक छळ करत होते. निलेश यांचे दुसऱ्या एका महिला डॉक्टरशी अनैतिक संबंध होते. या संबंधांमध्ये मनीषा अडथळा ठरत असल्याने, त्यांना मानसिक त्रास दिला जात होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच छळाला कंटाळून डॉ. मनीषा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी विविध कलमांतर्गत निलेश जेजुरकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच निलेश जेजुरकर फरार झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि गंगापूर रोड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. एका उच्चशिक्षित आणि प्रसिद्ध महिला डॉक्टरने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
