व्यावसायिक एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे सप्तश्रृंग गडावरील लाडू प्रसाद तयार करणे संपूर्णपणे थांबवली आहे. उपलब्ध साठा संपल्यानंतर लाडूची विक्री सुद्धा बंद करण्यात आली आहे. शिवाय, सशुल्क व्हीआयपी महाप्रसादालयही तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी देवी निवासिनी ट्रस्टतर्फे दररोज हजारो भाविक येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. महाप्रसादासाठी वरण- भात, पोळी, भाजी, बुंदी किंवा रव्याचा प्रसाद असा जेवणाचा मेन्यू असतो. पण गॅस टंचाईपासून वरण- भाताच्या ऐवजी मसाले भात, पोळी, भाजी, बुंदीचा प्रसाद असा जेवणाचा मेन्यू सध्या कायमचा ठेवलेला आहे.
advertisement
व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याचा फटका फक्त सप्तश्रृंगी देवी निवासिनी ट्रस्टलाच बसलेला नसून गडावरील हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर बसलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक चूल पेटवून नाश्ता, चहा आणि जेवण बनवण्याचा पर्याय निवडला आहे. गॅस नाही तर किमान चूलीच्या माध्यमातून तरीही आपला उदरनिर्वाह पूर्ण करत आहेत. तर अनेकांना चूलीचा सुद्धा पर्याय शक्य नसल्यामुळे त्यांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सप्तश्रृंग देवीच्या गडावर अनेक भाविक महाप्रसादाच्या रूपाने मोफत जेवणाची व्यवस्था करून देत होते. परंतू आता गॅस तुटवड्यामुळे ते सुद्धा आता बंद झाले आहे.
चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी देवीच्या गाभाऱ्यात लाखो भाविक येत आहेत. भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असताना अशातच गॅस तुटवड्याचा प्रश्न समोर येऊन उद्भवला आहे. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे चैत्रोत्सवाच्या नियोजनावर ताण पडला आहे. गॅस तुटवड्यातही सप्तश्रृंगी देवी निवासिनी ट्रस्ट वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग काढत भाविकांसाठी जेवणाची सोय करून देत आहे. जेवणाच्या मेन्यूमध्ये दिवसेंदिवस कमी करत गॅस सिलिंडरची बचत देवीच्या ट्रस्टकडून केली जात आहे.
