राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यावर शोककळा पसरली. तर, दुसरीकडे राजकीय क्षेत्रातही घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चांना वेग आला. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले.
निवडक नेत्यांचा सहभाग...
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची माहिती दोन्ही गटातील निवडक लोकांना होती. त्याचवेळी एनडीएतील महत्त्वाच्या नेत्यांनादेखील याची कल्पना देण्यात आली होती. एनडीएमध्येही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी चर्चा झाली होती. काही वेळ, चर्चांचा खल झाल्यानंतर एनडीएच्या नेत्यांनी हिरवा झेंडा दाखवला होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे.
advertisement
पुण्यातील 'ती' बैठक ठरली निर्णायक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या विलीनीकरणासाठी गेल्या वर्षभरापासून गुप्त बैठकांचे सत्र सुरू होते, ज्याची पहिली ठिणगी नागपुरात पडली होती. एका वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी २०२६ रोजी पुण्यात एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, रोहित पवार आणि डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी आपल्या राजकीय अडचणी आणि भविष्यातील रणनीतीवर मोकळेपणाने चर्चा केली. या चर्चेनंतर खुद्द शरद पवार यांनाही संपूर्ण प्रक्रियेची कल्पना देण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या विलीनीकरणाचे संकेत मिळाले होते. दुसऱ्या टप्प्यात दोन्ही राष्ट्रवादीने युती केली होती, जी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तिसऱ्या टप्प्यातही कायम आहे.
पक्षातील जबाबदाऱ्यांवर झालं होतं शिक्कामोर्तब...
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या शेवटच्या दोन बैठका राहिल्या होत्या. मात्र, त्याआधीच पक्षातील जबाबदाऱ्या निश्चित केल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. विलीनीकरणातील चर्चेनुसार नव्याने एकसंध होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अजित पवारच असणार होते. त्याशिवाय, राज्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकारही त्यांच्याकडे असणार होते. तर, सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रीय राजकारण आणि संसदेशी संबंधित विषयांचे नेतृत्व असणार होते. राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी जुन्या-नव्या पिढीची सांगड घालण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांची निवड होणार होती. तर, जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्याकडेदेखील राज्याच्या राजकारणात महत्त्वाची पदे आणि संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात येणार होती.
राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य...
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया सुरूच झाली नव्हती, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा गटातील नेत्यांनी केला. त्यांच्या या आरोपांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले. जे आमच्या बैठकीत चर्चेलाच नव्हते, त्यांना आमच्यात काय चर्चा झाली, याची कशी माहिती असेल? असा सवाल पवार यांनी केला. एकप्रकारे शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि दादा गटातील नेत्यांचे दावे खोडून काढले.
