भाजप पदाधिकारी अॅड. विवेकानंद गुप्ता यांनी मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांना पत्र लिहिले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या बायकोला, मुलीला, मुलाला, नातवाला तिकीट न देण्याची मागणीच त्यांनी केली आहे. अॅड. गुप्ता यांचे पत्र समोर आले आहे.
अमित साटम यांना दिलेल्या पत्रात काय म्हटलं?
गुप्ता यांनी आपल्या पत्रात म्हटले की, भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या व्हाट्सअप ग्रुप वरती मी आपले स्टेटमेंट वाचलं "BMC ELECTION IS NOT A FAMILY BUSINESS" मी आपल्या या वक्तव्याचे स्वागत करतो ही अत्यंत चांगली घोषणा असून कार्यकर्त्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अत्यंत आदर्शवत आहे. वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात जिद्दीने काम करतात त्यालाही काही ध्येय असतात, काही इच्छा असतात, आकांक्षा असतात, अपेक्षा असतात. कार्यकर्ता राजकारणात काम करतो त्याला काही ना काही तरी सन्मानाचे पद मिळाले पाहिजे अशी त्याची तीव्र इच्छा असते, असे गुप्ता यांनी म्हटले.
advertisement
त्यांनी पुढे म्हटले की, भाजप कार्यकर्त्याला निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर ती कोणत्यातरी नेत्याच्या, कोणत्यातरी पदाधिकाऱ्यांच्या हट्टाखातर त्याला ती गमवावी लागते आणि मग येणारी निराशा ही खूप खूप वाईट आणि विचित्र असते. आपला पक्ष कार्यकर्ताभिमुख आहोत आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. आपण कोणत्याही मोहाला बळी न पडता कोणत्याही दबावाला बळी न पडता कोणत्याही नेत्याच्या इच्छेला, निर्देशाला बळी न पड़ता जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला तिकीट द्यावं अशी मागणी केली आहे. भाजप नेत्याच्या मुलांना, पत्नीला तिकीट न देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्यात जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. भाजपकडून काही उमेदवारांची निश्चिती करण्यात आल्याची चर्चा आहे. याआधीच्या निवडणुकीत भाजपमध्ये काही नेते, पदाधिकाऱ्यांच्या मुलांना निवडणुकीत उमेदवारी दिली असल्याचे समोर आले होते. आता, अॅड. गुप्ता यांच्या पत्रावरून भाजपातही घराणेशाहीच्या मुद्यावर अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
